सेलू / प्रतिनिधी
खेडे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सुदृढपणातच सशक्त भारतीय अर्थक्रांतीचे बीज लपलेले आहे.भारताची सर्वांगीण अर्थपूर्ण व्यवस्था निर्माण करण्यासाठी महात्मा गांधींनी खेडी समृद्ध झाली तरच देश समृद्ध होणार याचं गमक शोधलं होतं. यासाठी ' खेड्याकडे चला 'हा संदेश गांधीजींनी दिला असे प्रतिपादन डॉ.सोहम पंड्या यांनी स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुल आयोजित व देवगिरी नागरी सहकारी बँक म.औरंगाबाद प्रायोजित स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेत केले.' ग्रामीण उद्योजकतेचे तंत्र' या विषयावर ते बोलत होते.व्याख्यानमालेचे हे ९ वर्ष आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी नागरी सहकारी बँकेचे प्रतिनिधी श्रावण भवर , व्याख्यानमालेचे संयोजक गौतमराव सूर्यवंशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
डॉ.सोहम पंड्या पुढे म्हणाले की , खादी ही पर्यावरण ,अर्थव्यवस्था आणि अध्यात्म यांच्या त्रिवेणी संगमाने युक्त होती.आज ६० लाख महिला खादीचा व्यवसाय करतात आणि आपला उदरनिर्वाह चालवितात. व्यक्तीमध्ये असणाऱ्या असाधारण क्षमतेचा विकास करण्यासाठी नवीन दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे.
शिक्षण हे पदवी - प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नव्हे तर आपलं कौशल्य विकसित करण्यासाठी हवं .स्वातंत्र्यसंग्रामात खेडी आत्मनिर्भर होती ,उद्योग विकासासाठी घराघरांत सुत कताईचं कार्य चालत असे.२० हजार वर्षांपूर्वी सूतकताईचं तंत्र भारतात विकसित झाले असेही ते म्हणाले.
शेती व शेतीवरील पूरक व्यवसाय यातूनच ग्रामीण अर्थ विकास देशात अर्थक्रांती घडू शकते .ppt प्रोजेक्टर द्वारे ग्रामीण विकासाचे मूलमंत्र , कचरा व्यवस्थापनातुन रोजगार निर्मिती , बायोगॅस , ऊर्जा निर्मिती , पर्यावरण पूरक घरे , शेती तंत्र आदी विषयावर सखोल मार्गदर्शन केले.प्रश्नउत्तराच्या माध्यमातून शंका समाधान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन साळवे,प्रास्ताविक गौतमराव सुर्यवंशी सरस्वती वंदना व पसायदान पूजा महाजन ,आभार विजय चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विवेकानंद शैक्षणिक संकुलातील शिक्षकवृंद , कर्मचारी आणि देवगिरी नागरी सहकारी बँकेचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें