सिल्लोड तालुक्यातील अजिंठा - शिवना येथील एल्गार यात्रेत जनतेच्या समस्यांचा वाचला पाढा ;
सिल्लोड : प्रतिनिधी (दि.२६) -
झोपेचं सोंग घेऊन भाजपा सरकारने भुलथापा मारून शेतकरी शेतमजुरांसह सर्वसामान्य जनतेला संकटाच्या खाईत लोटण्याचे पाप केले आहे. अशा थापड्या व झोपेचं सोंग घेणाऱ्या सोंगाड्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी जनतेला हातात रुमन घेतल्याशिवाय पर्याय नाही. सामान्य जनतेला आधार देण्यासाठी व महागाई तसेच दुष्काळाच्या संकटाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठीच काँग्रेस पक्षाच्या वतीने एल्गार यात्रा काढण्यात आली आहे. शेतक-यांना गंभीर दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत असुन या लबाड - ढोंगी सरकारने आठ दिवसांत दुष्काळ जाहीर न केल्यास सरकार विरोधात रुमणं हातात घेऊन मंत्र्यांना रस्त्यांवर फिरू देणार नाही असा ईशारा माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी एल्गार यात्रेच्या विविध सभातून दिला आहे.
सिल्लोड तालुक्यातील अजिंठा, शिवना, धोत्रा, पानवडोद व गोळेगाव येथे एल्गार यात्रेत हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या अडी अडचणी जाणून घेत असतांना माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी असा ईशारा बोलतांना दिला आहे.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, नरसिंगदादा चव्हाण, अशोक सुर्यवंशी, मुरलीधरराव काळे, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार आदिंनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
पुढे बोलतांना आ.अब्दुल सत्तार यांनी भाजप सरकार शेतकरी विरोधी सरकार असुन व्यापा-यांच्या हितांचे निर्णय घेऊन भ्रष्टाचारीच्या खोटारड्या मुद्यांवर सत्ता मिळवून राफेलसारखा कोट्यावधींचा भ्रष्टाचार करीत चौकीदारच भागीदार बनले असल्याचा आरोप करीत भाजपच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करून टीकेची तोफ डागली. दिन - दलित सामान्य जनता महागाईच्या खाईत भरडली जात असुन डिझेल - पेट्रोलच्या किंमती गगणास भिडल्याने नागरिकांना आर्थिक फटका सहन करावे लागत आहे. भाजप सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठीच एल्गार यात्रा काढण्यात आली असल्याचे मत माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर, धरमसिंग राठोड, नंदकिशोर सहारे, सतीश ताठे, प्रभाकर आबा काळे, दामुआण्णा गव्हाणे, अली चाऊस, शेख सलिम, अब्दुल अजिज, विठ्ठलराव सपकाळ, सलिम हुसैन, रऊफ बागवान, राजु गौर, राजुमिया देशमुख, सुनिल दुधे, शेख बाबर बागवान, मतीन देशमुख, अजिज चाऊस, संदिप राऊत, गजानन काळे, मनोहर आरके, गणेश डकले, अब्दुल बासित, राजेश्वर आरके, अमोल कुदळ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें