जगभरातील ६०० विचारवंतांचे मोदींना पत्र.
नवी दिल्ली : भारतातील परिस्थिती भयानक असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर दीर्घकाळ मौन पाळले असल्याचा आरोप करीत कठुआ आणि उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेबद्दल जगभरातील ६००हून अधिक विचारवंत, अभ्यासकांनी शनिवारी संताप व्यक्त केला. त्यांनी मोदींना पत्र पाठवले असून, त्यावर न्यूयॉर्क, ब्राऊन, हार्वर्ड अॅण्ड कोलंबिया यांसारखी विद्यापीठे व ‘आयआयटीं’मधील शिक्षणतज्ज्ञ आणि विद्वानांच्या स्वाक्षरी आहेत.‘कठुआ आणि उन्नावमधील घटनांवर आम्ही संताप व्यक्त करीत आहोत. या घटनांनंतर त्या राज्यांतील प्रशासनाने हे राक्षसी कृत्य करणाऱ्या आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. आपल्या पक्षाच्या प्रवक्त्याने या घटनांवरून लक्ष वळवण्याचा, वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न केला. देशातील या भयानक स्थितीवर तुम्ही दीर्घकाळ मौन पाळून असल्याचे आणि या घटनांशी आपल्या पक्षाचे असलेले संबंध, जे नाकारता येणार नाहीत, आम्ही पाहात आहोत,’ असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. ‘मोदी यांनी या मुद्द्यांवर दीर्घकाळ पाळलेले मौन (नेहमीप्रमाणे) सोडले असले तरी ते अपुरे, एकसुरी आणि बळींना न्याय देईल अशी खात्री देणारे नव्हते,’ असा आरोपही या विचारवंतांनी केला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें