*सदाभाऊ खोत जनतेचे मालक झाले काय?; भानगडी काढण्याचा इशारा!*
सांगली : राज्यमंत्री झालात म्हणजे जनतेचे मालक झालात काय असा सवाल आज सदाभाऊ खोत यांना माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला. वाळवे तालुक्यातील तुमच्या साऱ्या भानगडी यापुढे चव्हाट्यावर आणण्यासाठी माहिती अधिकाराअंतर्गत आंदोलन सुरु केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि. द. बर्वे, जिल्हा सुधार समितीचे नेते रवींद्र चव्हाण, ग्राहक पंचायतीचे ज्ञानचंद्र पाटील, माहिती अधिकार संघटनेचे कार्यकर्ते संभाजी सावंत, लोक संवाद केंद्राचे आशिष कोरी, संभाजी ब्रिगेडचे सुयोग औंधकर, रामचंद्र जाधव, दत्तात्रय पाटील, प्रशांत जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
माहिती अधिकार कार्यकर्त्यांना चाप लावला पाहिजे, असे विधान मंत्री खोत यांनी काल केले होते. श्री खोत यांच्या मरळनाथपूर गावातील विविध शासकीय योजनांमधील गैरव्यवहाराचे प्रकरण सध्या धसास लागले आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी.पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर, मराठा महासंघाचे सागर जाधव, कृष्णा जंगम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करून भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. या पार्श्वभूमीवर खोत यांनी केलेल्या विधानाचा कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.
*कार्यकर्त्यांनी मांडलेली भूमिका अशी :*
जनतेचा पैसा योग्य कारणी लागावा यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते जीव पणाला लावून भ्रष्टाचार उघडकीस आणत आहे. स्वातंत्र्यानंतर महत्प्रयासाने हा कायदा तयार झाला. मात्र जनआंदोलनातून मंत्रीपदापर्यंत पोहचलेले सदाभाऊ सत्तेच्या गुर्मीतून लोकशाही व कायदाविरोधी विधाने करीत आहेत. खाई त्याला खवखवे या उक्तीप्रमाणे त्यांचे हे विधान आहे. माहिती अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांवर कायद्याने कारवाई होऊ शकते.त्यासाठी सदाभाऊंना धमकी द्यायची गरज नाही. मात्र सदाभाऊंचे वर्तन चोराच्या उलट्या बोंबा प्रमाणे आहे. चाप लावण्याचे आदेश देणाऱ्यांना चाप लावण्याची ताकद माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे तारतम्य ठेवून बोला. लवकरच मरळनाथपूरमधील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते अर्ज दाखल करतील. ते जनतेचे आंदोलनच असेल.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें