महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यातील ९ महिने ते १५ वर्षाच्या मुलांना गोवर रूबेला लस देण्याचा कार्यक्रम आरोग्य विभागाने हाती घेतला आहे. त्यातंर्गत रुबेला लस टोचल्यानंतर गंगाखेड व पालम तालुक्यातील १७ बालकावर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले आहेत. या लसीमुळे पालक व विद्यार्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने मागील ३ महिन्यापासून रूबेला लसीकरणाची जनजागृती करण्यासाठी प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसह पालकांना आरोग्याच्या दृष्टीने रुबेला लसीकरण किती महत्वाचे आहे, याची जागृती केली होती. त्यानुसार मागील आठ दिवसांपासून विविध शाळेंना तारखा देऊन आरोग्य विभाग प्रत्यक्ष शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना लसीकरण करत आहेत.
यानुसार त्या शालेय विद्यार्थ्यांना रुबेला लसीकरण करण्यात अाले. लसीकरण झालेल्या बालकांपैकी काही काहींना तासानंतर मळमळ, उलटी, डोके, दुखणे श्वसनाचा त्रास सुरु झाला. त्यामुळे विद्यार्थी व पालकामध्ये घबराट निर्माण झाली आहे. या घबराटीमुळे पालकांनी विद्यार्थ्यांना गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांवर उपचार केले.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे म्हणाले, रुबेला लसीकरणामुळे कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाहीत. लसीकरणामुळे विद्यार्थी घाबरत आहेत. परंतु लसीकरणामुळे 1000 विद्यार्थ्यांमागे दहा ते बारा विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरुपात ताप येणे, उलटी होणे, मळमळ करणे व श्वासोश्वासास त्रास होणे आदी लक्षणे होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थी व पालकाने घाबरुन जाऊ नये, या लसीने सुरक्षीतता आहेच. याचा कोणताही दुष्परिणाम आरोग्यावर होणार नाही. असे डॉ. हेमंत मुंडे म्हणाले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें