भीषण अपघातात आई व मुलगा ठार ● भोकरदन मधील विरेगाव जवळील घटना
भोकरदन दि. ०१ (प्रतिनिधी)
बहिणीच्या साखरपुड्यासाठी खरेदी करून परतत असताना भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा येथील आई व मुलाला विरेगाव जवळ काळीपिवळी ने उडवल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन मोटारसायकलस्वार व काळी पिवळीतील असे पाच जण जखमी झाले आहेत.पैकी चार जणांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद ला पाठवण्यात आले आहे.
आज दि.०१ गुरुवार रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान वालसा वडाळा येथील कमळाबाई साहेबराव पवार वय ४५ ह्या मुलीचा दोन दिवसांनी साखरपुडा असल्याने मुलगा रवींद्र साहेबराव पवार वय २२ याच्यासोबत भोकरदन ला खरेदी करून गावाकडे परतत असताना भोकरदन जवळील विरेगाव जवळ काळी पिवळी गाडी नं.एम.एच.२० बीटी ७०३१ ने त्यांना आणि अन्य दोन दुचाकीस्वारालाही धडक दिली.या धडकेत काळी पिवळी पलटी होऊन दोन दुचाकी त्यांच्या खाली आल्या.यामध्ये कमळाबाई पवार व मुलगा रवींद्र पवार हे दोघेही जागीच ठार झाले. तर बाबर खान शफीक खान वय २०, रफिक बेग हैदर बेग वय ३२, साबिया शेख रफिक वय ४५ नय्युम खान निजाम खान पठाण वय ४० सर्व राहणार सिल्लोड आणि ताबेहर बागवान मन्नू रा.औरंगाबाद हे जखमी झाले. जखमींपैकी रफिक बेग हैदर बेग हे आपल्या लहान मुलाबरोबर यामाहा दुचाकीवर होते ते किरकोळ जखमी झाले आणि सुदैवाने त्यांच्या मुलालाही काही दुखापत झाली नाही. इतर सर्वांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद ला पाठवण्यात आले आहे.
दरम्यान राञी उशीरा वैद्यकीय अधिकारी डॉ मुळे यांनी मयता चे शवविच्छेदन करून व सदरील घटनेचा पंचनामा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले .सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साखळे,पोलिस काॅ.बाबासाहेब काजळकर,विजय जाधव,रामेश्वर सिन्नकर यांनी घटनास्थळी दाखल भेट देऊन काळी पिवळी चालक याच्याविरुद्ध 304,279,337,338भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साखळे करीत आहे.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें