ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे निधन.
समशेर खान.विशेष.प्रतिनिधी.
माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अयशस्वी ठरली. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून पतंगरावांवर लीलावती रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अधिक उपचारासाठी त्यांना अमेरिकेत हलवले जाणार, असेही सांगितले जात होते. मात्र, पतंगरावांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली. परखड आणि रोखठोक बोलण्यासाठी परिचित असलेले पतंगराव कदम राजकीय क्षेत्रात चाळीस वर्षाहून अधिक काळ ते कार्यरत होते. काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या पतंगरावांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तब्बल २० वर्षाहून अधिक काळ अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. यामध्ये महसूल, उद्योग, सहकार, वने, पुनर्वसन व मदत, शिक्षण या खात्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही त्यांचे अनेकदा नाव आले. तत्परतेने आणि धाडसी निर्णय घेणारे मंत्री म्हणून त्यांची राज्यात छाप होती. आताच्या पलूस-कडेगाव (पूर्वीचा भिलवडी-वांगी) मतदार संघातून तब्बल सहा वेळा ते निवडून आले. राज्याच्याच नव्हे तर देशातील राजकारणातही त्यांचा तितकाच दबदबा होता. त्यांच्यानिधनाने महाराष्ट्राने एक तळागाळातून आलेला संवेदनशील मनाचा नेता गमावल्याची भावना सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें